Scroll to top

डायबेटीस व स्त्री आरोग्य .


vinayakhingane - March 8, 2015 - 7 comments

IMG_5200

मधुमेह हा म्हणावं तर आपल्यासाठी परिचित अन म्हणावं तर अगदी अपरिचित असा आजार आहे . काही वर्षांपूर्वी सधन समाजात किंवा विकसित देशांचा समजला जाणारा हा आजार आज भारतात अगदी सर्रास आढळतो. आज प्रत्येक घरात किंवा निदान शेजारी तरी मधुमेहाचा रुग्ण असतोच. फक्त माधुमेह्च नाही तर त्याच्याशी संबंधित असे बरेचशे प्रश्न आज आपल्याला भेडसावत असतात . मधुमेहामुळे होणारी शारीरिक व आर्थिक हानी  वैयक्तिक पातळीवर न बघता राष्ट्रीय किंवा सामाजिक पातळीवर बघायला गेलो तर मधुमेह हा एक सामाजिक प्रश्न होऊन आपल्या समोर उभा ठाकलाय हे जाणवते. आपल्या ह्या समाजाचा एक मोठा व महत्वाचा भाग म्हणून या संदर्भात  स्त्रियांची एक महत्वाची भूमिका आहे . मधुमेहाने ग्रस्त रुग्णांमध्ये स्त्रियांची संख्या ही जवळपास निम्मी आहे . त्यातही मधुमेहग्रस्त स्त्रीवर्गाचे काही स्वतंत्र असे प्रश्न आहेत व त्यांच्याकडे विशेष लक्ष पुरवण्याची गरज आहे. गरोदरपणातील मधुमेह हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. पण केवळ मधुमेहाचे बळी म्हणूनच स्त्रियांचा ह्या बाबतीत उल्लेख होऊ शकत नाही. प्रत्येक घरात अन प्रत्येक व्यक्तीच्या जीवनशैलीवर स्त्रीचा एक महत्वाचा प्रभाव असतो . मधुमेह हा बहुतांशी जीवनशैलीशी निगडीत आजार आहे . तेव्हा मधुमेहाच्या प्रतिबंधासाठी स्त्रियांचा सहभाग हा अनिवार्य आहे .

मधुमेहाच्या स्त्री आरोग्यातील प्रश्नाकडे बघताना काही पैलू प्रकर्षाने जाणवतात . गरोदरपणातील मधुमेह हा एक तसाच पैलू आहे . हा मधुमेह आपल्या ओळखीच्या माधुमेहापेक्षा जरा वेगळा असून ह्याचे प्रमाण बरेच आहे . पण काही वेळा गरोदरपणातील ह्या महत्वाच्या समस्येकडे खूप दुर्लक्ष् झाल्याचे दिसते . गरोदारावास्थेतील मधुमेह( Gestational Diabetes) ही संकल्पना नेहमीच्या माधुमेहापेक्षा थोडी वेगळी आहे . नेहमीचा मधुमेह (type 2 Diabetes Mellitus)  हा एक जुनाट आजार आहे . एखाद्या व्यक्तीला मधुमेह झाला की तो पूर्ण बरा होत नाही . जीवनशैलीतील बदल व औषधांनी त्याला नियंत्रणात ठेवावे लागते . पण गरोदरपणातील मधुमेह हा फक्त गरोदरपणात दिसतो व बाळंतपनानंतर ठीक होतो व औषधांशिवाय साखरेचे रक्तातील प्रमाण नियंत्रणात राहते . हा या दोन माधुमेहांमधील महत्वाचा फरक आहे . असे असले तरीही गरोदर अवस्थेतील मधुमेहामध्ये साखरेच्या प्रमाणाचे नियंत्रण जास्त काटेकोर ठेवणे हे अत्यंत गरजेचे असते .(कारण बाळाच्या योग्य विकासाचा प्रश्न असतो).गरोदरपणातील मधुमेहाच्या काही रुग्णांना पुढील आयुष्यात नेहमीचा मधुमेह होण्याची शक्यता असते . म्हणून अशा रुग्णांनी जास्त सतर्क राहण्याची गरज असते . गरोदर अवस्थेतील ह्या मधुमेहाविषयी आपण अधिक जाणून घेऊया .

गरोदरपणात स्त्रियांच्या शरीरात बरेच बदल घडतात . ह्यातील काही रासायनिक बदल व संप्रेरका मधील बदल हे गरोदरपणातील इन्सुलिन व साखर ह्यांच्यावर परिणाम करतात . अशा वेळी शरीरातील साखर व इन्सुलिन ह्यांचे संतुलन अगदी नाजूक होऊन जाते . काही वेळा हे संतुलन ढळते आणि इन्सुलिनचा प्रभाव कमी पडू लागतो . अशा वेळी रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्यपातळी  पेक्षा जास्त वाढते व आपण त्याला मधुमेह म्हणतो . आईच्या रक्तातील साखरेचे अशा प्रकारे वाढलेले प्रमाण हे बाळाच्या आरोग्यासाठी घातक असते . ह्यामुळे बाळाच्या शरीरात व्यंग निर्माण होऊ शकते. बाळाचा आकार व वजन जास्त वाढून त्यामुळेही त्रास होण्याची शक्यता असते. असे बाळ जरी गुटगुटीत दिसत असले तरी ते निरोगी नसून अशक्त असते . कधी कधी तर आईच्या पोटातच बाळाचा मृत्यू होण्याचा धोका अशा स्थितीत असतो. आईच्या रक्तातील साखरेचे वाढलेले प्रमाण हे आईच्या आरोग्यासाठी सुद्धा त्रासदायकच असते. म्हणून आईच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहणे हे आवश्यक असते . ह्या साठी गरोदर स्त्रियांची नियमित तपासणी होणे आवश्यक असते  . डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे रक्ताची तपासणी करून आजारांचे निदान करून घेणे कधीही उत्तम . गरोदरपणातील मधुमेहाचे निदान करण्यासाठी ग्लुकोज टोलरंस  टेस्ट नावाची तपासणी केली जाते . ज्या गरोदर स्त्रियाचे वय हे पंचवीस वर्षांपेक्षा जास्त आहे, ज्या लठ्ठ आहेत  किंवा ज्यांच्या जवळच्या नातेवाईकांना मधुमेह आहे त्यांनी अशी तपासणी आवर्जून करावी .(कारण अशा स्त्रियांमध्ये गरोदरपणातील मधुमेहाचे प्रमाण जास्त आढळते)

गरोदरपणातील मधुमेह हा जरी त्रासदायक असला तरी त्याला फार घाबरून जाण्याचे कारण नाही. जर ह्या मधुमेहाचे योग्य वेळी निदान झाले तर वेळीच साखरेचे नियंत्रण करून धोका पूर्णपणे टाळता येतो . बरेचदा तर आहारातील पथ्य व व्यायाम अशा जीवनशैलीतील बदलही साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेसे ठरतात . जर ह्या बदलानंतरही साखर नियंत्रणात आली नाहीतर औषधींचा वापर करता येतो .बाळाची वाढ बघण्यासाठी आजकाल अद्ययावत अशा सुविधा उपलब्ध झाल्या असून त्याची आपल्याला अशा वेळी फार मदत होते. वेळीच निदान झाल्यास अशा रुग्णांची बाळंतपणे अगदी सामान्य स्त्रियांप्रमाणे होतात . आपल्याकडे गरोदरस्त्रीला सल्ला देणारी बरीच मंडळी असते . ह्यातील बर्याच लोकांना गरोदरपणातील मधुमेहाविषयी काहीच कल्पना नसते . त्यामुळे निदान होऊनही त्याकडे दुर्लक्ष होते किंवा उपचारात दिरंगाई होते . अशा वेळी मात्र बरेचशे दुष्परिणाम रुग्णाला व बाळाला भोगावे लागू शकतात . म्हणूनच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, आहाराची पथ्ये काटेकोर पाळणे , नियमित व्यायाम व औषधे ह्यांना पर्याय नाही हे लक्षात ठेवावे .

गरोदर अवस्थेतील माधुमेहानंतर आपण वळूया नेहमीचा मधुमेह किंवा कमी वयात येणाऱ्या मधुमेह असणाऱ्या स्त्रियांकडे . आजकालच्या काळात मधुमेहाचे प्रमाण बरेच वाढले असून कमी वयातही स्त्रिया मधुमेहाने  ग्रस्त असतात . त्याचप्रमाणे  काही महिलांमध्ये थोडी उशिरा गर्भधारणा होते . अशा वेळी स्त्रीला मधुमेह आहे व तिला गर्भधारणा होण्याची शक्यता किंवा इच्छा आहे अशी परिस्थिती निर्माण होते . ह्या परिस्थितीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे . रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात नसेल तर गर्भाच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात अडथाडे येतात . गर्भाच्या वाढीचा सुरुवातीचा काळ हा अतिशय संवेदनशील असतो . साखरेचे अनियंत्रित वाढलेले प्रमाण हे बाळामध्ये व्यंग निर्माण होण्यास कारणीभूत होऊ शकते . म्हणून गर्भधारणे पूर्वी आईच्या शरीरातील साखरेचे प्रमाण काटेकोर नियंत्रित असावे . इच्छुक जोडप्याने डॉक्टरांचा सल्ला घेऊन साखर नियंत्रित असताना बाळाचे प्लानिंग करावे . गर्भ राहिल्यानंतर पहिल्या दिवसांमध्ये नियमित तपासणी करून साखर नियंत्रणात राहते आहे ना याची खात्री करून घ्यावी . सगळ्या माधुमेहाप्रमाणे इथेही आहार , नियमित व्यायाम व औषधे ही त्रिसूत्री महत्वाची ठरते . आईची नियमित तपासणी जशी आवश्यक आहे तसेच पोटातील बाळाची सोनोग्राफी द्वारे तपासणी डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घ्यावी . बाळाला काही गंभीर व्यंग असल्यास त्याची माहिती अशा वेळी कळते .

गर्भावास्थेमध्ये वरील दोन्ही प्रकारच्या मधुमेहात दिली जाणारी औषधे ही तज्ञ डॉक्टरांनी दिलेली असावी . अशी औषधे बाळावर कुठलाही वाईट परिणाम करत नाहीत . बरेचदा गरोदार्पनामध्ये कुठलीही औषधे घेऊ नये अशी समजूत असते व त्यामुळे अत्यावश्यक औषधे  घ्यायला रुग्ण नकार देतात . या औषधांप्रमाणेच फोलिक असिड सारखी काही औषधे बाळामध्ये वाढीसाठी आवश्यक असतात . त्याचप्रमाणे इतर काही आजार किंवा आहार सत्वांची कमतरता आढळल्यास डॉक्टर त्याचाही उपचार करतात . अशी औषधे घेताना कुरकुर करू नये . मधुमेह ग्रस्त आईच्या बाळाला काही काळ जास्त देखरेखीची गरज असते . अशा बाळांमध्ये साखरेचे प्रमाण अचानक कमी होण्याची शक्यता असते . डॉक्टर अशा बालांवर लक्ष ठेऊन असतात व वेळीच उपचार करतात .

गर्भावास्थेशिवाय महत्वाचा दुसरा एक पैलू म्हणजे स्त्रियांमध्ये दिसून येणारे मधुमेहाचे दुष्परिणाम . भारतामध्ये स्त्रियांचे आरोग्य म्हटले की स्त्री रोग हाच एक विषय प्रामुख्याने पुढे येतो . मधुमेहासारखा आजार हा स्त्रि आरोग्यावर एक गंभीर संकट म्हणून उभा आहे ह्याचा आपल्याला विसर पडतो. आज मधुमेहाच्या रुग्णांपैकी पन्नास टक्के महिला असतात . पण तरीही हा काही बायकांचा आजार नाही असा समज महिलावर्गात काहीसा दिसतो . साधारण वयाच्या चाळीशी नंतर काही तपासण्या नियमित करून घेणे उत्तम .(जसे की साखरेची तपासणी,बी पी , ई सी जी , कोलेस्तेरोल इत्यादी ). ह्या तपासण्याही करून घेण्यास स्त्रियांचा सहभाग कमी असल्याचे बरेच ठिकाणी दिसून येते.

मधुमेह हा कुठल्याही एका कारणामुळे होणारा आजार नाही. बरीचशी गुंतागुंतीची कारणे एकत्र येऊन मधुमेह होतो . आपल्याला  कळलेल्या कारणांपैकी काही महत्वाची कारणे किंवा धोक्याची लक्षणे  म्हणजे चुकीची जीवनशैली, स्थूलता, शारीरिक व्यायामाचा अभाव, उच्च रक्तदाब  व काही प्रमाणात अनुवांशिक दोष . यातील बरेचशी  धोक्याची लक्षणे आज महिला वर्गात दिसून येतात. स्त्रियांचे काम हे कष्टाचे नसून घरकाम आहे असा एक अतिशय चुकीचा समज  काही ठिकाणी प्रचलित असल्यामुळे स्त्रियांना शारीरिक व्यायामाची गरज असते ह्याकडे दुर्लक्ष होते. आज पुरुषांच्या व्यायामाच्या अभावाकडे जेवढे लक्ष वेधले गेले  तेवढे कदाचित स्त्रीयाच्या  व्यायामाच्या अभावाकडे गेले नाही. व्यायामा व्यतिरिक्त स्त्रियांच्या आहार आणि ताणतणाव ह्या बाबतीत घरातील सगळ्यांचेच दुर्लक्ष होते .कधी कधी स्त्रियांची जीवनशैली ही त्यांच्या स्वतःसाठी दुय्यम असते व त्यांची प्राथमिकता  घरातील इतरांची जीवनशैली सुधारण्यासाठी असते की काय  असे वाटते. आपल्या जीवन शैलीतील हे दोष मधुमेहाला आमंत्रण ठरू शकतात. स्त्रियांच्या बाबतीत पी सी ओ डी हा आजार किंवा गरोदरपणातील मधुमेह ही सुद्धा धोक्याची लक्षणे असतात . आपण भारतीय एक सकट बाकी (युरोपिअन किंवा अमेरिकन ) लोकांपेक्षा जास्त मधुमेहाला बळी पडतो . ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपल्या आजूबाजूच्या कितीतरी स्त्रियांना मधुमेह होण्याचा धोका आहे हे आपल्या लक्षात येईल! पण असा विचार करून काळजी घेणाऱ्या महिला आणि पुरुष अगदी विरळ .

मधुमेहामुळे स्त्रियांच्या आरोग्यावर बरेच दुष्परिणाम होतात . त्यातील सगळ्यात काळजीचा म्हणजे हृदयरोग . मधुमेही रुग्णांपैकी स्त्रियांना पुरुषांपेक्षा हृदयरोगाचा धोका जास्त असतो . कधी कधी अशा महिला रुग्णांमध्ये हृदयविकाराची लक्षणे सौम्य प्रकारची दिसतात व त्याकडे दुर्लक्ष होते . लक्षणे सौम्य असली तरीही आजार गंभीरच असतो व उपचार उशिरा झाल्यामुळे किंवा न झाल्यामुळे गंभीर परिस्थिती ओढवते . मधुमेही महिला रुग्णांमध्ये हृदयाशी संबंधित इतर आजारही बर्याच प्रमाणात आढळतात . बैठेकाम किंवा घरकाम करताना बरेचदा शारीरिक मेहनत होत नाही . अशा वेळी हृदयविकाराची लक्षणे दिसत नाहीत .  मला फक्त मधुमेह आहे आणि साखर नियंत्रित राहते म्हणून मी डॉक्टरांकडे जात नाही अशी वृत्ती घातक ठरू शकते . मधुमेहामध्ये फक्त साखरेची तपासणी न करता डॉक्टरांच्या सल्याने बाकी तपासण्याही नियमित करून घेणे जरुरीचे असते .

मधुमेहाच्या स्त्री रुग्णांना होणारा आणखी एक महत्वाचा त्रास म्हणजे वारंवार होणारा जंतुसंसर्ग . योनीमार्गात किंवा लघवीच्या मार्गात वारंवार जळजळ किंवा सूज येणे व ती लवकर बरी न होणे, ताप येणे   अशी लक्षणे काही महिलांमध्ये दिसतात . ह्या लक्षणांची  लगेच काळजी घेतल्यास निदान होऊन उपचार होण्यास मदत होते . फंगल किंवा बुरशीजन्य संसर्ग होण्याचे प्रमाणही मधुमेहाच्या रुग्णांमध्ये खूप असते . त्वचेचा जंतुसंसर्ग किंवा जखमेत होणारा जंतुसंसर्ग हे सुद्धा बरेचदा दिसून येतात .ह्या सगळ्या जन्तुसंसार्गावरचा उपचार प्रारंभिक अवस्थेत  सहज शक्य असतो . पण जंतुसंसर्ग पसरल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते . म्हणून त्रास अंगावर काढणे टाळावे . मधुमेही गरोदर स्त्रियांच्या बाबतीत तर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते . कारण योनीमार्गात किंवा लघवीच्या मार्गातील जंतुसंसर्ग उपचार न केल्यास गर्भाशयापर्यंत जावू शकतो व आई आणि बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो.

मधुमेह हा जीवनशैलीशी संबंधित आजार आजार आहे तसेच तो पूर्णपणे बरा होणारा आजार नसून त्याला नियंत्रणात ठेवावे लागते .हे करताना जीवनशैलीतील बदल खूपच महत्वाचे  असतात . स्त्रियांचा ह्या संदर्भातील दृष्टीकोन हा आपया चर्चेचा शेवटचा पण कदाचित सगळ्यात महत्वाचा पैलू आहे . स्त्री चा परिवारातील इतर व्यक्तींच्या जीवनशैलीवर बराच प्रभाव असतो .  आहार हा मधुमेहाच्या उपचारातील तसेच प्रतिबंधातील महत्वाचा दुवा आहे . आणि म्हणूनच स्वयंपाकघर हे मधुमेहाच्या उपचाराचे खूप महत्वाचे साधन आहे . इथेही स्त्री ची भूमिका फार महत्वाची आहे . एक जागरूक स्त्री केवळ स्वतःचा नाही तर संपूर्ण परिवाराचा मधुमेहापासून बचाव करू शकते . घरातील जेवण समतोल असल्यास मधुमेहींना पथ्य पाळणे सोपे जाते तसेच परिवारातील इतरांच्या आरोग्यासाठी ते उत्तम असते . आहाराप्रमाणे औषधांबाबत उदासीनता ही एक मोठी गोष्ट आहे .  ही उदासीनता कधी आर्थिक कारणांमुळे येऊ शकते . काही घरांमध्ये स्त्रियांना आजही आर्थिक स्वातंत्र्य नाही हि आपल्यासाठी खेदाची गोष्ट आहे . कधी कधी समाजातील मधुमेहाच्या पगड्यामुळे स्त्रिया उपचार घ्यायला कचरतात . शहरात ही परिस्थिती कमी असली तरी ग्रामीण अशा गोष्टी सरार्स घडताना दिसतात . औषधांची भीती , त्यातल्या त्यात इन्सुलिन विषयीची भीती व गैरसमज हा एक फार मोठा घटक असतो .मधुमेहातील आहार व औषधांविषयी अधिक माहिती ह्या लेखात देणे शक्य नाही ह्या बाबतीत दिलगीर आहे. पुढील काही लेखांमध्ये त्या विषयावर चर्चा करूया .

मधुमेहाविषयी व त्याच्या उपचाराविषयी समाज म्हणून आपण अंधारातच आहोत . आणि अंधाराची जशी भीती वाटते तशी तसेच आपण मधुमेहाला घाबरून आहोत . मधुमेहाविषयी थोडी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे . कदाचित मधुमेहाचा रुग्ण म्हणून किंवा रुग्णाचे नातेवाईक म्हणून सामना करताना जरा धीर येईल अशी आशा करतो . तुमच्या प्रतिक्रिया किंवा शंका असल्यास आवर्जून पाठवा .

Contact Us
close slider

    Discover more from Vinayak Hingane

    Subscribe now to keep reading and get access to the full archive.

    Continue reading

    ×

    Hello!

    Click one of our representatives below to chat on WhatsApp or send us an email to vinayakhingane@gmail.com

    ×