Scroll to top

डायबेटीस च्या आहारी जाताना 


vinayakhingane - April 2, 2015 - 2 comments

IMG_2555
मधुमेह म्हटला की सगळ्यांच्या जिभेवर येणारा पहिला शब्द म्हणजे शुगर! मधुमेहाचा साखरेशी खूप घनिष्ट संबंध जोडला गेला आहे . मधुमेह म्हणजे शरीरातील साखर वाढते , सारखी रक्तातील साखर तपासावी लागते आणि साखर खाणे बंद ; एवढी माहिती साधारण सगळ्यांना असते . एकंदरच हा आजार वैतागवाणा आहे  पण त्यातल्या त्यात गोड खाण्याच्या बंदीमुळे जरा जास्तच तापदायक आणि किचकट झाला आहे. बर्याच लोकांना गोड आवडते. तसेच कुठल्याही चांगल्या प्रसंगी गोड खाण्याची आपल्याकडे प्रथा आहे .गोड  चहाही  आपल्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग झालाय . अशा परिस्थितीत गोड खाण्यावर बंदी म्हणजे एखाद्या व्यक्तीवर किती अन्याय असा एक दृष्टीकोन आपल्या समाजात रूढ झालाय . मधुमेहाच्या रुग्णाकडे असा अन्याय सहन करणारा, दीनवाणा  व दुर्दैवी असे म्हणून तरी बघितले जाते  किंवा एवढ्याश्या साखरेनी काय होते  असे म्हणून त्याच्या आहार पथ्याची टर  तरी उडवली जाते . असे दोन्ही टोकाचे दृष्टीकोन किती चुकीचे आहेत !आहार हा मधुमेहाचा तसेच त्याच्या उपचाराचा एक खूप महत्वाचा भाग आहे . आहार व जीवनशैलीचे अनेक पैलू मधुमेहात खूप उपयोगाचे असतात . पण त्याविषयीची चर्चा साखरेविषयी / गोड विषयीच्या आपल्या टोकाच्या दृष्टिकोनामुळे मागे पडतात . आज आपण आहार व त्याचा मधुमेहाशी संबंध ह्या विषयी थोडी चर्चा करूया. ही चर्चा फक्त मधुमेही रुग्णांसाठी नसून ह्या रुग्णांचे मित्र , नातेवाईक तसेच मधुमेहाचे संभाव्य रुग्ण म्हणून आपल्या सगळ्यांसाठीच आहे .
गोड खाण्याचा आणि मधुमेह होण्याचा काही संबंध आहे का ह्या शंके पासून आपण सुरुवात करू . ह्यासाठी मधुमेह कसा होतो हे थोडक्यात जाणून घेऊ . मधुमेहाचे महत्वाचे दोन प्रकार .टाएप १ डायबेटीस व टाईप २ डायबेटीस . त्यापैकी  नेहमी दिसणारा मधुमेह हा टाईप २ . शक्यतो चाळीशीनंतर दिसणारा हा आजार आजकाल तरुण वयोगटात सुद्धा दिसू लागला आहे . हा मधुमेह होण्याची कारणे समजण्यास थोडी किचकट अन गुंतागुंतीची असतात . पण  ह्यातील सगळ्यात महत्वाची कारणे म्हणजे चुकीची जीवनपद्धती आणि अयोग्य आहार . वाढलेला मानसिक ताणताणाव , कमी झालेला शारीरिक व्यायाम आणि वाढलेले वजन ह्यांचा शरीरातील साखरेच्या संतुलनावर विपरीत परिणाम होतो . हा परिणाम खरे म्हणजे लहान वयातच सुरु होतो . पण आपले शरीर हा ताण सहन करते. वर्षानुवर्ष जर  शरीरावर हा ताण येत राहिला तर शरीराची सहन शक्ती संपते व रक्तातील साखर अनियंत्रित व्हायला लागते .ह्यालाच आपण मधुमेह म्हणतो . काही रुग्णांमध्ये वेगळ्या काही कारणांमुळे (उदा. अनुवांशिक दोष )सुद्धा  मधुमेह होतो . दिवसभरातील आहारामधील क्यालरीज (उष्मांक ) हे वजनाच्या व शरीरातील साखरेच्या संतुलनाच्या दृष्टीने महत्वाचे असतात . साखरेमध्ये बर्याच क्यालरीज आपल्या पोटात जातात . जर आपण बैठे काम किंवा घरकाम करत असू आणि शारीरिक व्यायाम (ह्यात योगासने येत नाहीत) करत नसू तर ह्या क्यालरीज मेद किंवा fat मध्ये रुपांतरीत होतात .त्याच प्रमाणे साखरेचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो . ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे एखादा पदार्थ खाल्यावर त्यामुळे  रक्तातील साखर किती प्रमाणात वाढते ह्याचे परिमाण . साखर खाल्यावर रक्तातील  साखरेचे प्रमाण जास्त वाढते . त्या मानाने इतर कर्बोदके (उदा . कडधान्ये ) खाल्यावर रक्तातील साखरेचे प्रमाण थोडे कमी वाढते . म्हणून जास्त प्रमाणात साखर / मिठाई खाणे हे फारसे योग्य नाही . पण रोजच्या आहारातील साखर व गोड चहा ह्यांनी मधुमेह होईल असे म्हणणे चुकीचे होईल . साखरेपेक्षा जास्त क्यालरीज आपल्याला मेद युक्त पदार्थ व fast फूड मधून मिळतात . पदार्थ जास्त रुचकर करण्यासाठी हॉटेल्स व उपहारगृहांमध्ये मेदयुक्त जेवण बनविल्या जाते . fast फूड चा आकार लहान अन क्यालरीज जास्त असतात .  अशा पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा जास्त असतो .ह्या सगळ्या गोष्टी नियमित खाणार्यांचे वजन हमखास वाढते . बाहेरचे पदार्थ फारसे न खाणार्यांनी घरच्या तेलाच्या वापराकडे व स्निग्ध पदार्थांच्या सेवनाकडे बारीक लक्ष ठेवणे फार आवश्यक असते . खासकरून जे रोज व्यायाम करत नाहीत, बैठे काम  किंवा घरकाम करतात त्यांनी तर जास्त सतर्क असण्याची गरज असते .  अशा प्रकारे डायबेटीस हा साखरेमुळे होणारा आजार नसून  चुकीचा आहार, वाढलेले वजन,  व्यायामाचा अभाव व ताणताणाव ह्यांनी होणारा आजार आहे .सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या गोष्टी लहान किंवा तरुण वयातच समजणे व योग्य सवयी लागणे आवश्यक आहे . असे झाले तर बर्याच मधुमेहाच्या भावी रुग्णांना आपल्याला वाचवता येईल .
मधुमेहाच्या रुग्णांनी सुद्धा वरील गोष्टी लक्षात घेऊन आपल्या आहारावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे . कारण मधुमेह झाल्यावरही तो नियंत्रित ठेवल्यास त्याचा त्रास  कमी होतो  व मधुमेहाच्या नियंत्रणात आहार  फार महत्वाचा  आहे. आहार व जीवनशैलीतील बदलांनी साखर नियंत्रित ठेवण्यासाठी एका औषधा इतकी मदत होऊ शकते . ह्याचा अर्थ औषधे बंद करता येतील असे नाही पण मधुमेहाची औषधे कमी नक्कीच होऊ शकतात . मधुमेहाच्या सुरुवातीच्या काळात योग्य आहाराने रक्तातील साखर नियंत्रित ठेवणारे बरेच रुग्ण असतात . (पण जसा जसा आजार जुना होत जातो तशी औषधांची गरज वाढते  म्हणून साखर नियंत्रित आहे कि नाही हे नियमित तपासावे व वेळोवेळी वैद्यकीय सल्ला घ्यावा) . योग्य आहार व जीवनशैलीतील सुधाराने मधुमेहींचे आरोग्य लक्षणीय सुधारते .मधुमेहाचे रुग्ण असलेल्या एका काकांचा अनुभव इथे मांडावासा वाटतो . त्यांची साखर उत्तम नियंत्रणात होती व इतर परिमाण जसे वजन लिपीड प्रोफाईल ई सी जी इत्यादी सुद्धा चांगले होते . तरीही काका थोडे काळजीत वाटले म्हणून त्यांना विचारल्यावर कळले कि काकांचे समवयस्क मित्र हृदयविकाराच्या झटक्याने गेले . त्यांना मधुमेह नव्हता  . आपण त्यामुळे कधीही डॉक्टरांकडे जात नाही आणि कुठीलीही तपासणी करण्याची आपल्याला कटकट नाही असे काकांना सांगणाऱ्या मित्राला शेवटी डॉक्टरांना भेटण्याची संधीही मिळाली नाही .मित्र गेला म्हणून काका हळहळले . पण आपण मधुमेहाचे रुग्ण असून आणि हृदयविकाराचा धोका आपल्याला जास्त असूनही आपण इतर अनेकांपेक्षा जास्त  फिट आहोत म्हणून डायबेटीस हा ब्लेसिंग इन डीसगाइस आहे असे सांगून काका गेले . काकांसारखा आशादायी विचार अन वागणूक औषधाच्या एका गोळी पेक्षा जास्त प्रभावी आहे.
पण काकांसारखे रुग्ण अगदी कमी . डायबेटीस व आहाराकडे बघण्याचा दृष्टीकोन कमालीचा उदासीन असतो . मधुमेहातील आहार , पथ्ये , विविध टिप्स ह्या आजकाल बर्याच प्रमाणात उपलब्ध असतात . पण ही माहीति हाताशी असूनही आपण मधुमेहींच्या आहाराकडे कानाडोळा करतो . कधी तर मधुमेहाच्या रुग्णांची तसेच नातेवाईकांची काही स्वभाववैशिष्टे नमुनेदार असतात . ‘काही होत नाही ‘ हा दृष्टीकोन सर्रास बघायला मिळतो . शुगर जास्त आहे – काही होत नाही . व्यायाम बंद , काही होत नाही . थोडसं गोड खाल्याने काय होणार ! काही होत नाही . मी फुल साखर खातो .डॉक्टरकडे गेलो होतो . एक आठवडा औषध घेतलं . त्यानंतर औषध बंद. फक्त प्राणायाम करतो . मला काहीही होत नाही . असे सांगणारे अनेक रुग्ण बघायला मिळतात . खास म्हणजे आपण किती वेगळे आहोत असा अविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर असतो . ह्या अशा आत्मघातकी दृष्टीकोनामागे निव्वळ हलगर्जी नसून आणखी काही करणे आहेत . मधुमेहाची किंवा साखर वाढल्याची लक्षणे लगेच दिसत नाही . त्यामुळे साखर खूप वाढूनही बरेचदा पेशंट ला काहीच त्रास होत नाही व त्याचा अर्थ साखर वाढल्याने काही होत नाही असा काढल्या जातो. पण अनियंत्रित साखर ही आजारांना निमंत्रण. अशा रुग्णांना अत्यवस्थ अवस्थेत आय सी यु मध्ये दाखल होताना , कुणाचा पाय कापावा लागताना तर कोणाला जीव गमावताना बघणे दुखद असते. वाढलेली साखर ही फक्त एक संकल्पना नसून अनियंत्रित आजाराचे लक्षण आहे . टीप ऑफ आईसबर्ग म्हणतो तसे . म्हणून एखाद्या मधुमेहाच्या रुग्णाला आग्रह करून वाढताना आपण आपण त्याला संकटात ढकलतोय हे लक्षात ठेवा . शेवटी ‘फरक तो पडता हे भाई !’ . कधीतरी संयम सुटणे व एखाद्या वेळी आहारनियंत्रण थोडे शिथिल होणे कुणीही समजू शकेल . पण काही रुग्णांना पथ्य मोडण्याची सवयच लागते . मग अशा वेळी ‘हायपो ‘ म्हणजेच हायपो ग्लायसेमिया  किंवा साखर कमी झाल्याची लक्षणे सांगून शुगर न तपासताच साखर खाल्ली जाते . सणवार व ऋतूंचा नावाखाली गोड खाल्या जाते . उन्हाळ्यातील लग्न व आंबे आणि दिवाळीतील फराळ ह्यामुळे शुगर वाढलेली आढळणे  काही नवीन नाही .काही रुग्ण तर यावर कडी म्हणजे साखर तपासणीच्या आठवड्यात कडक पथ्य पाळून चक्क चांगला रिपोर्ट आणून दाखवतात ! मग पुढील तपासणी पर्यंत छातीठोकपणे आपल्याला हवे तसे वागतात.  अशा वेळी डॉक्टर म्हणून आपण ह्या व्यक्तीला जबरदस्ती, त्याच्या इच्छेविरुद्ध उपचार देतोय का असा प्रश्न पडतो. नातेवैकांची स्थिती तर आणखीच बिकट असते. एकीकडे रुग्णाच्या मधुमेहाची चिंता तर दुसरी कडे गोड खायला नाही म्हणावे तर वाद . रुग्ण बरेचदा ‘मला माझ्याच घरात खाण्यावर बंदी’ किंवा ‘ तुम्ही माझं खानं काढता ‘ अस काहीतरी बोलून इमोशनल ब्ल्याक्मेल करतात . पण अशा वेळी डॉक्टर व नातेवाईकांनी रुग्णाला त्याच्या मनासारखे करू देणे म्हणजे त्याला वार्यावर सोडून देण्यासारखे आहे . मधुमेहामध्ये साखरेचे नियंत्रण नियमित असणे आवश्यक आहे . मधेच वाढलेली साखर व अनियमित नियंत्रण त्रासदायक असते . अशा वेळी गेल्या साधारण तीन महिन्यांचे साखरेचे नियंत्रण दाखवणारी ‘ एच बी ए वन सी ‘ ही तपासणी उपयोगी पडते . नेहमीची साखरेची तपासणी नॉर्मल असली तरी ही तपासणी सदोष असल्यास आहारातील अनियमितता लक्षात येऊ शकते  व उपचारात बदल करता येतात .
मी अजिबात गोड खात नाही . चहा पण बिनसाखरेचा पितो . भात तर अगदी बंदच केला आहे . मग तरीही माझी शुगर का वाढते हो डॉक्टर ? हा प्रश्न बरेच रुग्ण विचारतात . मी माझ्या बाजूने पूर्ण योगदान दिले आहे . आता साखर नियंत्रित करण्याची जबाबदारी डॉक्टर आणि मेडिकल सायन्स ह्यांची आहे . ती का वाढते आहे हे डॉक्टरांनी शोधून आम्हाला सांगावे अशी काहीशी पेशंटची मानसिकता असते . अशा केसेस मध्ये थोडी चौकशी केल्यास बहुतांशी रुग्णाचे योगदान कमी पडते असे दिसते(पथ्ये न पाळणे, व्यायामाचा अभाव किंवा औषधे योग्य पद्धतीने न घेणे) . काही रुग्णांचा आजार खूप जुना होतो व त्यांना जास्त औषधांची किंवा इन्सुलिनची गरज असते तर अगदी किरकोळ संखेतील रुग्णांना अधिक तपासाची गरज असते . साखर नियंत्रित राहत नसेल तर आपल्या पथ्य व जीवनशैलीचा आढावा घ्यावा . आहाराची  व  व्यायामाची रोजनिशी ठेवावी . वर चर्चिल्या प्रमाणे फक्त साखर नाही तर आहारातील  इतर घटकांनी सुद्धा शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते हे लक्षात ठेवून असावे . वजन नियंत्रित आहे कि नाही हे बघावे . आहारतज्ञाचा सल्ला अशावेळी उपयोगी पडतो .
काही रुग्ण मधुमेहासाठी आयुर्वेदिक किंवा इतर काही उपचारपद्धती घेण्यासाठी उत्सुक असतात . मी आधुनिक आरोग्यशास्त्राचा अभ्यासक असल्याने मी इतर उपचार पद्धतींवर बोलणे चुकीचे आहे . पण कुठलीही उपचार पद्धती घेताना किमान नियमित चाचण्या व आरोग्यतपासणी आधुनिक पद्धतीने करून घेणे चांगले . कारण मधुमेहाची लक्षणे बरेचदा दिसत नाही व आजाराची तीव्रता जाणून घेण्याची तेवढी एकमेव पद्धत आज आपल्याला आम्हीत आहे . अशा वेळी  आजार नियंत्रित राहत नसेल उपचार पद्धती बदलण्याची संधी मिळू शकते.
डायबेटीस च्या रुग्णांनी उपवास करू नये. आपल्या धार्मिक समजुती उपवासाला खूप महत्व देतात.पण उपवासाचा मधुमेही रुग्णाच्या आरोग्यावर फार विपरीत परिणाम होतो . रुग्ण साखर कमी करण्याच्या औषधांवर असल्यामुळे नेहमीचा आहार घेतला न गेल्यास साखरेचे प्रमाण अतिशय कमी होते . वर्षभरापूर्वी एका महिला रुग्णास नातेवाईक आकस्मिक विभागात घेऊन आले . पन्नाशीचे वय असलेल्या त्या बाईना मधुमेह होता . डॉक्टरांनी तपासणी केली असता त्या बाई बेशुद्ध होत्या व स्वतःची उलटी श्वासंनालीकेत अडकून अत्यवस्थ झाल्या होत्या . त्यांची शुगर लेव्हल २० म्हणजेच अतिशय कमी झालेली होती . नासेतून शुगरची सलाईन दिल्यावर थोडी सुधारणा झाली पण पुढे काही दिवसांनी ह्यातून उद्भवलेल्या संसर्गामुळे त्या आय सी यु मध्ये दगावल्या . चौकशी नंतर कळले की त्यांनी कडक उपवास केला होता व नेहमीची औषधेही घेतली होती . साखर कमी झाल्याची लक्षणे त्यांना रात्री आली असतीलही . पण खोलीत त्या एकट्या असल्यामुळे कदाचित हा अनर्थ ओढवला . ह्याच्या अतिशय उलट म्हणजे उपास करताना इन्सुलिन व इतर औषधे न घेतल्यामुळे शुगर अतिशय जास्त वाढून आय सी यु मध्ये दाखल झालेले रुग्ण सुद्धा असतात . जीवावर बेतण्याचे असे प्रसंग नेहमी येत नसले तरी उपवास प्रसंगी साखरेच्या प्रामाणात होणार बदल हे रुग्णाच्या आरोग्यास घातकच असतात. एका अर्थाने मधुमेहाच्या रुग्णांना उपवास हा रोजच पाळायचा असतो . तो त्यांनी आहाराची पथ्ये , व्यायाम करून व नियमित औषधे घेऊन पाळावा .इतर नातेवाईकांनी सुद्धा उपवास करताना जशी मदत करू तशी त्यांना पथ्ये पाळण्यास मदत करावी . ज्यांना मधुमेह नाही त्यांनी सुद्धा आहार व वजनाचे व्रत पाळल्यास पुण्य नाही मिळाले तरी मधुमेहापासून दूर राहता येईल.
Contact Us
close slider

    Discover more from Vinayak Hingane

    Subscribe now to keep reading and get access to the full archive.

    Continue reading

    ×

    Hello!

    Click one of our representatives below to chat on WhatsApp or send us an email to vinayakhingane@gmail.com

    ×