माझ्या आतापर्यंतच्या तापाविषयी सगळ्या लेख आणि व्हिडीओ च्या लिंक येथे एकत्रित केल्या आहेत. तुम्हाला हे सगळे लेख एकापाठोपाठ एक लवकर सापडतील!
डेंजर डास! डासांमुळे होणारे आजार
डॉ विनायक हिंगणे
माझ्या आतापर्यंतच्या तापाविषयी सगळ्या लेख आणि व्हिडीओ च्या लिंक येथे एकत्रित केल्या आहेत. तुम्हाला हे सगळे लेख एकापाठोपाठ एक लवकर सापडतील!
डेंजर डास! डासांमुळे होणारे आजार
डॉ विनायक हिंगणे
चिकनगुनिया हा एक त्रासदायक आजार आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी चिकनगुनियाची मोठी साथ आली होती. तेव्हा पासून चिकनगुनिया हा शब्द लोकांच्या ओळखीचा झाला. आज ह्या आजाराबद्दल थोडं जाणून घेऊया.
चिकनगुनिया म्हणजे काय? हा काय आजार आहे?
चिकनगुनिया हा व्हायरस किंवा विषाणू मुळे होणारा आजार आहे. चिकनगुनिया चे व्हायरस रुग्णाच्या शरीरातून डासांमार्फत निरोगी व्यक्तीच्या शरीरात जातात. हे व्हायरस किंवा विषाणू निरोगी व्यक्तीच्या शरीरात वाढून त्याला चिकनगुनिया चा आजार होतो. हा आजार बराचसा डेंगू सारखा आहे. या दोन्ही आजारांचे विषाणू ‘एडिस’ ह्या जातीच्या डासांमुळे पसरतात. त्यांना टायगर डास सुद्धा म्हणतात. डेंगू किंवा चिकनगुनिया हे आजार संसर्गजन्य नाहीत. म्हणजेच आजारी व्यक्तीच्या स्पर्शाने पसरणारे नाहीत. डासांचा नायनाट केला तर डेंगू आणि चिकनगुनिया ला दूर ठेवता येईल.
चिकनगुनियाची लक्षणं काय?
चिकनगुनिया हा तापाचा आजार आहे. ताप हा साधारण तीन ते चार दिवस असतो. ताप थंडी वाजून येऊ शकतो. सोबत डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ होणे, उलटी होणे, पुरळ येणे इत्यादी लक्षणं दिसू शकतात. पण तापासोबतचे मुख्य लक्षण म्हणजे सांधेदुखी. सांधेदुखी जोरदार असते. हातापायाचे छोटे आणि मोठे सगळेच सांधे दुखू शकतात. सांध्यांवर सूज सुद्धा येऊ शकते. हे दुखणं इतकं त्रासदायक असतं की पेशन्ट हवालदिल होतात. चिकनगुनिया ह्या आफ्रिकन शब्दाचा अर्थ (दुखण्याने)वाकून गेलेला असा होतो. ही सांधेदुखी काही दिवस असते व ताप कमी झाल्यावर हळूहळू कमी होते. पण काही पेशंट मध्ये ही सांधेदुखी बराच काळ टिकू शकते. डॉक्टरांच्या सल्याने औषध घेतल्याने ही सांधेदुखी बरी होण्यासारखी असते.
चिकनगुनियाचं दुखणं हे तीव्र स्वरूपाचं असलं तरी ह्या आजारात जीवाला धोका होत नाही. डेंग्यूत ज्याप्रमाणे रक्तवाहिन्या पाझरून रक्तदाब (बीपी) कमी होउ शकतो किंवा इतर अवयवांवर परिणाम होऊ शकतो तसे गंभीर परिणाम चिकनगुनियात सहसा दिसत नाहीत. त्यामुळे घरी आराम करून इलाज करण्यासारखा हा आजार आहे.
पण
पण हे नेहमी लक्षात ठेवावं की तुम्हाला चिकनगुनिया वाटणारा आजार हा दुसरा ताप असण्याची शक्यता असू शकते. तापाचे बरेच आजार पहिल्या काही दिवसात सारखेच दिसतात. हिवताप(मलेरिया) किंवा टायफॉईड ला विशिष्ट औषध द्यावे लागते. डेंगू मध्ये विशेष लक्ष ठेवावे लागते. त्यामुळे हे आजार नाहीत ना ह्याची खात्री काही पेशन्ट मध्ये आपल्याला करून घ्यावी लागते. पुढील काही लक्षणं दिसल्यास आपण डॉक्टरांना लगेच भेटून तपासणी करून घ्यावी.
धोक्याची लक्षणे
ताप कमी न होणे किंवा वाढत जाणे
चक्कर येणे
पोटात खूप दुखणे
वारंवार उलटी होणे
नाकातून/तोंडातून/लघवी संडास वाटे रक्तस्त्राव होणे
चक्कर येणे
दम लागणे/धाप लागणे
लघवी कमी होणे
गुंगी येणे
हातपाय थंड पडणे, बीपी कमी होणे
लहान मुलांमध्ये मुल सारखे रडणे
मुलांचे खाणे व पिणे कमी होणे
इत्यादी लक्षणं दिसल्यास वेळ न दवडता डॉक्टरांना भेटावं. ही लक्षणं चिकनगुनियाची नसून गंभीर आजारांची असू शकतात.
चिकनगुनियाचे निदान
चिकनगुनिया साठी रक्ताची तपासणी आजाराच्या साधारणतः एक आठवड्यानंतर करतात. अँटिबॉडी ची ही तपासणी चिकनगुनिया आहे की नाही हे सांगू शकते. ही तपासणी डॉक्टरांच्या निदानाला पूरक म्हणून करतात.
इतर तापाच्या आजारांची शक्यता फेटाळून लावण्यासाठी डॉक्टर इतरही काही तपासण्या सांगू शकतात.
चिकनगुनियाचा उपचार
इतर व्हायरल तापांप्रमाणेच चिकनगुनिया हा आपोआप बरा होणारा आजार आहे. ह्या व्हायरस च्या विरोधात कुठलेही औषध सध्या तरी आपल्याकडे नाही. त्यामुळे उपचार हा लक्षणं कमी करण्यासाठी दिला जातो.
आराम करावा.
दुखण्यासाठी व तापासाठी पॅरासीटामॉल व गरज पडल्यास वेदनाशामक औषधे घावी.
भरपूर पाणी व पेये घ्यावीत.
ताप गेल्यावरही दुखणे सुरु राहिल्यास डॉक्टरांना भेटावे. ही सांधेदुखी जवळपास सगळया पेशंट मध्ये ठीक होते.
जर रक्तदाब, डायबेटिस , किडनीचे आजार किंवा हृदयविकार ह्यासारखे काही आजार असतील तर अधिक काळजी घेण्याची गरज असते.
डास हा आपला राष्ट्रीय शत्रू आहे. आपल्या शेजारी राष्ट्रांपेक्षा जास्त नुकसान डास करतात. त्यामुळे डासांचा नायनाट करणं हे प्राधान्य आहे. वैयक्तिक पातळीवर आपल्या घरातील व परिसरातील डासांचा नायनाट करणे व स्वच्छता ठेवणे तसेच नगरपालिका/ ग्रामपंचायत पातळीवर प्रयत्न करून गावातील डासांचा नायनाट करणे आवश्यक आहे.
डासांपासून वाचण्यासाठी मच्छरदाणी, हातपाय झाकणारे कपडे, डास दूर ठेवणाऱ्या क्रीम इत्यादींचा वापर करू शकतो.
डॉ विनायक हिंगणे
डेंगू हा आजार समजून घ्या. डेंगू विषयी अवाजवी भीती टाळा. अधिक माहिती साठी डेंगू विषयी थोडेसे व तापाबद्दल बरेच काही हे लेख वाचा.
ताप म्हणजे काय?
ताप म्हणजे शरीराचे तापमान नेहमीच्या तापमानापेक्षा वाढणे. निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान हे सकाळी ९८.९ पेक्षा कमी असते तर संध्याकाळी तापमान ९९. ९ पेक्षा कमी असते. शरीराचे तापमान ह्यापेक्षा जास्त वाढल्यास आपण त्याला ताप म्हणतो .काही वेळेस रुग्णाला ताप नसताना सुद्धा कसकस जाणवते किंवा ताप आल्यासारखे वाटते . अशा वेळी तापमानाची नोंद ठेवलेली असल्यास निदान करणे सोपे होते. तापातील चढ उतारांची ठेवण ह्यावरून सुद्धा बरेचदा आजाराचे निदान होण्यास मदत होते . म्हणून प्रत्येक घरात थर्मामीटर (तापमापक) असणे आवश्यक आहे . व ताप आल्यावर त्याची नोंद ठेवणे आवश्यक आहे . आजकाल वापरायला सोपे असे थर्मामीटर मिळतात . बगलेमध्ये त्वचेच्या संपर्कात ठेऊन किंवा तोंडात जिभेखाली थर्मामीटर ठेऊन तापमान मोजता येते. बगलेमधे तापमान तोंडातील साधारणतः अर्धा ते एक अंश कमी दिसू शकते . एखादा गरम पदार्थ घेतल्यास लगेच तोंडातील तापमान घेणे टाळावे . ५ वर्षाखालील मुलांमध्ये बगलेतील तापमान घेतात व तोंडातील तापमान घेणे टाळतात .
सध्या भारतात डेंगू चे रुग्ण दगावल्या मुळे सगळीकडे दहशतीचे वातावरण असल्याचे चित्र वृत्तवाहिन्यांवर दिसते आहे . डेंगू विषयी माहितीच्या अभावामुळे ह्या आजाराविषयीची भीती जास्त वाढते. डेंगू आणि काही गैरसमज ह्याविषयी आपण आज थोडक्यात जाणून घेऊया.
डेंगू हा विषाणू मुळे होणारा आजार आहे . हे विषाणू एडीस नावाच्या डासामुळे पसरतात. हे डास स्वछ पाण्यात अंडी घालतात आणि वाढतात . घरात पाण्याचा साठा केल्यास ह्या डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता जास्त असते . त्याचप्रमाणे पावसाळ्यात पाणी साचून त्यात हे डास वाढतात. उन्हाळ्यात कुलर च्या पाण्यातही हे डास वाढू शकतात. घर व परिसरात डास होणार नाहीत ह्याचा प्रयत्न केल्यास डेंगू व मलेरिया ह्या दोन आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. हे डास दिवसा चावतात . त्यामुळे रात्रीप्रमाणे दिवसासुद्धा डासांपासून संरक्षणाची गरज असते .
डेंगू चे तीन प्रकार बघायला मिळतात . सोप्या भाषेत सांगायचे झाले तर पहिला प्रकार हा थोडा सौम्य असतो . ह्यात ताप , डोकेदुखी , उलटी व अंगदुखी अशी लक्षणे दिसतात .
दुसरा प्रकार हा जास्त तीव्र असतो व त्यात पहिल्या प्रकारातील लक्षणा सोबतच रक्तस्त्राव होऊ शकतो .
तिसरा प्रकार हा तीव्र स्वरूपाचा असून त्यात रुग्ण अत्यवस्थ होऊ शकतो. अशा स्वरूपाच्या डेंगू मुळे रुग्ण दगावू शकतो. तीव्र स्वरूपातील डेंगू ची धोक्याची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत .
१. पोटात दुखणे
२. सारखी उलटी होणे
३. रक्तस्त्राव होणे
४. बिपी कमी होणे
५. लघवी कमी होणे
६. हातपाय थंड पडणे
७. दम लागणे
८. लहान बाळाने सारखे रडणे
वरील लक्षणे दिसल्यास डॉक्टरांना त्वरित दाखवावे .
तीव्र आजारात डॉक्टर रुग्णाची तपासणी करून आजाराची गंभीरता बघतात . मध्यम गंभीरतेच्या आजाराचे रुपांतर अतिशय गंभीर आजारात लवकर होऊ शकते . म्हणून अशा रुग्णांना दवाखान्यात ठेवण्यात येते . अत्यवस्थ रुग्णांना आय सी यु मध्ये ठेवण्यात येते. पण साधा आजार असेल तर घरी पाठवून परत तपासणी साठी बोलावणे हे सुद्धा डॉक्टर सुचवू शकतात. ताप साधारणता तीन ते चार दिवस असतो व धोक्याची लक्षणे ताप गेल्यानंतर दिसू शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला मानून फोलो अप ठेवावा . धोक्याची लक्षणे दिसल्यास लगेच वैद्यकीय सल्ला घ्यावा .
साध्या डेंगू मुळे फारसा त्रास होत नाही . बरचसे रुग्ण तर डॉक्टरांकडे जाणेही टाळतात तरी बरे होतात . फक्त ताप व अंगदुखी साठी क्रोसिन ची गोळी पुरेशी ठरते व फारसा औषधोपचार करावा लागत नाही. डेंगू च्या वायरस किवा विषाणू साठी वेगळे काही औषध घ्यावे लागत नाही. डेंगू च्या सौम्य आजारात कमी होणार्या प्लेटलेट ह्या आपोआप सुधारतात. त्याला कुठलेही औषध द्यावे लागत नाही . ताप गेल्यानंतर प्लेटलेट पेशी कमी व्हायला लागतात व साधारण तीन ते चार दिवसानी परत वाढायला लागतात . एकदा प्लेट लेट पेशी वाढायला लागल्या कि त्यांचा वाढण्याचा दर फास्ट असतो . प्लेटलेट पेशी जर १०हजार च्या खाली गेल्या तर रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते म्हणून डॉक्टर प्लेट लेट पेशी देतात .हा एक तात्पुरता उपाय आहे तोही धोका टाळण्यासाठी. पण प्लेटलेट पेशी कमी होणे हे डेंगू च्या तीव्रतेचे लक्षण नाही. ब्लड प्रेशर किंवा बी पी कमी होणे , हातपाय थंड पडणे , लघवी कमी होणे हे गंभीरतेचे लक्षण आहे . शरीराच्या प्रतिकार शक्तीच्या परिणामांमुळे हे गंभीर परिणाम होतात व त्यांचा प्रभाव शरीरातील अवयवांवर होतो. गंभीर डेंगूचे प्रमाण(टक्केवारी) कमी असते. डेंगू झालेल्या थोड्या रुग्णांनाच गंभीर आजार होतो तरी त्यामुळे धोका होऊ शकतो . ह्याचा उपचार हा अतिशय सतर्कतेने करणे आवश्यक असते .
बहुतांशी रुग्णांमध्ये डेंगू फारसा त्रासदायक नसतो . त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नसते . त्याच प्रमाणे प्रत्येक रुग्णालाच दवाखान्यात भरती करण्याचीही गरज नसते
डेंगू ची तीव्रता ही प्लेटलेट पेशींच्या संख्येवर अवलंबून नसते. प्रत्येक रुग्णाला प्लेट लेट पेशी देण्याची गरज नसते . प्लेटलेट पेशी आपोआप वाढतात (काहीही औषध न देता). त्यामुळे पपई च्या पानांचा रस किंवा इतर कुठलेही औषध दिल्यामुळे काही फायदा होईल असे नाही . त्याचप्रमाणे गंभीर डेंगू मध्ये अशा पानांचा काही उपयोग झाल्याचे वैज्ञानिक उदाहरण नाही. आता तर पपई च्या पानांचा अर्क असलेल्या महाग गोळ्या उपलब्ध झाल्या आहेत . वैज्ञानिक दृष्ट्या त्यांचा काहीही उपयोग होण्याची शक्यता नाही.
डासांचा बंदोबस्त करणे व धोक्याची लक्षणे ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेणे हे अतिशय महत्वाचे उपाय आपल्या हातात आहेत . ह्या उपायांवर लक्ष केंद्रित करणे आणि बाकी घरगुती उपचाराच्या मर्यादा समजून घेणे हे महत्वाचे!
डॉ विनायक हिंगणे